मुंबई : आगामी पाच वर्षांत महाराष्ट्राला दुष्काळमुक्त करणे, पायाभूत सुविधांमध्ये पाच लाख कोटींची गुंतवणूक, एक कोटी नोकऱ्यांची निर्मिती, प्रत्येक नोंदणीकृत बेघराला घर, शेतीला दिवसा १२ तास वीज, प्रत्येक घरात नळाद्वारे पाणी अशा १६ प्रमुख संकल्पनांचा समावेश असलेल्या महाराष्ट्र प्रदेश भाजपच्या संकल्पपत्राचे प्रकाशन भाजपचे राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्या हस्ते मंगळवारी (१५ ऑक्टोबर) करण्यात आले. ‘महाराष्ट्राचा चेहरामोहरा येत्या पाच वर्षांत बदलून जाईल,’ असा विश्वास नड्डा यांनी या वेळी व्यक्त केला.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, राष्ट्रीय उपाध्यक्ष डॉ. विनय सहस्रबुद्धे, राष्ट्रीय सरचिटणीस आणि महाराष्ट्राच्या प्रभारी खा. सरोज पांडे, शालेय शिक्षणमंत्री विनोद तावडे, खा. विकास महात्मे, मुंबई भाजप अध्यक्ष आमदार मंगलप्रभात लोढा, प्रदेश मुख्य प्रवक्ते माधव भांडारी या वेळी उपस्थित होते.
नड्डा म्हणाले, ‘पाच वर्षांपूर्वी महाराष्ट्राची स्थिती अतिशय विदारक होती. भ्रष्टाचाराने कळस गाठला होता. अकार्यक्षमतेमुळे राज्यापुढे अनेक गंभीर समस्या निर्माण झाल्या होत्या. देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रिपदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर गेल्या पाच वर्षांत जनतेने भ्रष्टाचारमुक्त, सुशासनयुक्त, पारदर्शक, कार्यक्षम सरकारचा अनुभव घेतला. देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्राच्या विकासाचे चक्र गतिमान केले. या संकल्पपत्राद्वारे भारतीय जनता पक्षाने आगामी पाच वर्षांत राज्याच्या विकासाची दृष्टी जनतेपुढे मांडली आहे. राज्यातील प्रत्येक घटकाचा विचार करून हे संकल्पपत्र तयार करण्यात आले आहे. जी कामे करण्यासारखी आहेत, त्यांचाच या संकल्पपत्रात समावेश करण्यात आला आहे. तळातल्या माणसाला केंद्रबिंदू मानून तयार केलेल्या वास्तववादी संकल्पपात्रामुळे महाराष्ट्रात सुवर्णयुग येईल.’
प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील म्हणाले, ‘या निवडणुकीत विरोधकांकडे भाजपविरोधात मुद्देही शिल्लक नाहीत आणि नेतृत्वही नाही. गेल्या पाच वर्षांत महाराष्ट्रातील प्रत्येक समाजघटकाला न्याय देण्याचा प्रयत्न मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकारने केला आहे. आगामी पाच वर्षांत करावयाच्या कामांचा संकल्प आम्ही जनतेपुढे मांडत आहोत.’
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, ‘कृष्णा, कोयना या नद्यांचे, तसेच पश्चिमवाहिनी नद्यांचे समुद्रात वाहून जाणारे पाणी दुष्काळी भागात वळवून राज्याला दुष्काळमुक्त करण्याचा कार्यक्रम येत्या पाच वर्षांत आम्ही राबविणार आहोत. मराठवाड्यासाठी ११ धरणे एकमेकांना लूप पद्धतीने जोडून या भागाची पिण्याच्या पाण्याची टंचाई कायमस्वरूपी दूर करण्याची योजना आम्ही आखली आहे. एक कोटी कुटुंबांना महिला बचत गटांशी जोडून महिलांना रोजगार उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न आम्ही करणार आहोत.’
प्रदेश मुख्य प्रवक्ते माधव भांडारी यांनी सूत्रसंचालन केले. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि विधान परिषदेचे आमदार रामराव वडकुते यांनी या कार्यक्रमात भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी त्यांचे स्वागत केले.